*फासेपारधी मुलांच्या खडतर प्रवासाचे ‘‘प्रश्नचिन्ह...''*
*फासेपारधी मुलांच्या खडतर प्रवासाचे ‘‘प्रश्नचिन्ह...''*
आज ही चोरांची जमात म्हणजे फासेपारधी अशीच त्यांची ओळख समाजात आहे. या समाजातील मुलांसाठी शिक्षण हा तरणोपाय असल्याचे लक्षात घेऊन सुरू झाली झोपड्यातली शाळा ‘प्रश्नचिन्ह'. समाजापुढे पोटाचा प्रश्न, गावाचा प्रश्न, घराचा प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न, विविध दाखल्यांचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न... प्रश्न, प्रश्न, प्रश्न! प्रश्न प्रश्न!! म्हणून त्या शाळेचे नाव प्रश्नचिन्ह. पण याच प्रश्नचिन्हने आकार घेतला. समाजातील ४५५ मुले येथे शिकत आहेत. अनेकदा सूर्य डोईवर घ्यावा लागला. मतीन भोसलेनं हे धनुष्यबाण पेललं. शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर कुटुंबियांनी बोलणे बंद केले. पत्नीही विरोधात गेली. घरातील संघर्षाला दोन महिने तोंड दयावे लागले. आता पत्नी सीमाही त्याच्या खांद्याला खांदा लावून सोबत करतेय. हा प्रवास सोपा नव्हता, अजुनही नाही. या प्रवासात प्रश्नचिन्हला समृध्दीचा महामार्ग आडवा आला आहे. इतक्या वर्षांची मेहनतीने मिळालेल्या समृध्दीवर महामार्गासाठी पाणी सोडावं लागतयं. पुन्हा त्या मुलांसाठी संघर्ष करावा लागतोय. त्याचे फलित काय मिळेल त्याचं प्रश्नचिन्ह आहेच. मतीन आणि त्याच्या प्रश्नचिन्हासमोर येणारी प्रश्नचिन्ह कधी संपणार हे एक प्रश्नचिन्हच आहे.
*आनंद सागर*
लेख क्रमांक ४० - २
*महेश पवार*
पत्रकार, लेखक
संस्थापक : थंडरबोल्ट एक परिवर्तन
संपादक : जीवनदीप
भ्रमणध्वनी : ९९८७२६९४७६
दिनांक : २१ मार्च २०२१
यवतमाळचं साहित्य संमेलन. पुस्तकांच्या दालनात फेरफटका सुरु होता. सोबत नकळत सारे घडले मालिकेचे शीर्षकगीत लिहिणारा कवीमित्र निलेश उजाळ होता. ग्रंथदालनात अनेकजण आपापल्या प्रकाशनसंस्थेची हॅण्डबिल वाटत होते. अशातच एक हॅण्डबिल समोर आलं प्रश्नचिन्हचं. ते पाहताच आठवलं हे तर मतिनचं प्रश्नचिन्ह.. ते हॅण्डबिल वाटणाऱ्याला विचारलं, प्रश्नचिन्ह इथून किती लांब आहे. मतीनदा भेटतील का तिथे?, तर तो म्हणाला, मतीन सर इथेच आहेत. ते आम्हा दोघांना घेऊन मतीनजवळ गेला. मतीनची आणि माझी ती पहिली भेट पण अनेक वर्षांची असल्यासारखी. एकमेकांना पाहताच आम्ही कडकडून मिठी मारली. थंडरबोल्ट समुह आणि जीवनदीप अंकामुळे अनेक संस्थाचालक आता ओळखू लागले होते. दादा, आता मी तुम्हाला सोडणार नाही. इथवर आलात तर प्रश्नचिन्हला चलाच हा त्याचा आग्रह. तो काही मोडवेना. निलेशही सोबत यायला तयार झाला. अखेर मतिनच्या गाडीतून आम्ही प्रश्नचिन्हच्या दिशेनं निघालो. गाडीत गप्पाटप्पा चालूच होत्या. प्रश्नचिन्हला पोहोचलो. फ्रेश होऊन सीमा वहिनींनी वाढलेला भाकरी आणि वांग्याचं सुकं भरीत यावर ताव मारत मारत मतीन आणि प्रश्नचिन्हचा प्रवास ऐकू लागलो.
चोर..! फासेपारधी जमातीत मूल जन्माला आल्या आल्या सटवाईने त्याच्या कपाळी मारलेला हा शिक्का. पारधी मूळचे रजपूत लढवय्ये. हा समाज पानिपतच्या युद्धात लढला. त्यांचे काम प्रामुख्याने शस्त्रे पुरवण्याचे. इंग्रजांच्या रेल्वेचे लोखंड चोरून ते राजाला देत या आरोपाखाली इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि पारधी समाजाला चोर/दरोडेखोर म्हणून जाहीर केले. त्यामुळे त्या पारधी समाजाला जंगलात लपून राहावं लागलं. रानोमाळ भटकावं लागलं. स्वातंत्र्यानंतर कायदा बदलला. परंतु, समाजाची या लोकांकडे बघण्याची मानसिकता तीच राहिली. अंगावर फाटकेतुटके, मळलेले कपडे, बोलीभाषा न समजण्यापलीकडची, जवळ येताच अंगाला येणारी दुर्गंधी, पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याचं उष्टं- खरकटं किंवा भीक मागून आणलेलं अन्न.. असे भंगार आयुष्य जगणाऱ्या फासेपारधी समाजाला मुळात जगायचं कशाला ते ही माहीत नाही. आता जरी हे लोक समाजाजवळ येऊ लागले असले तरी त्यांच्या माथी मारलेला चोर नावाचा शिक्का अद्याप पुसला गेला नाही. घरकुले मिळाली, जमिनी मिळाल्या तरी त्या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी, समाजाला बदलविण्यासाठी, माथ्यावरचा शिक्का पुसण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सगळेच काही परिस्थितीला शरण जात नाहीत. त्यातले काही जिद्दी असतात भिंतीला भेग पाडून बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या रोपाप्रमाणे. मतीन भोसले याच पिंपळाच्या रोपाप्रमाणे.
मतीनचा जन्म कुडाच्या घरातला. वडील शिकार करायचे आणि आई धुणीभांडी करायची. गावात, परिसरात कार्य झाल्यावर राहिलेलं अन्न पत्रावळीत जमा करायचं. त्यावर मतीनसह तीन भाऊ, एक बहीण व आई-वडिलांची गुजराण व्हायची. आठवड़यातले दोन/तीन दिवस जेवण तर उरलेले दिवस पाण्यावर काढायचे. खायला अन्न नाही, अंगावर पुरेसे कपडे नाही. अभ्यासाला पुस्तकं नाही अशा अडचणींना तोंड देत तो शिकला. पदवीधर झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करु लागला. शिक्षणामुळं माणसाला माणसासारखं जगता येतं ही जाणीव झाली अन् आपल्या अडाणी समाजाला शहाणं करण्याचा विचार झऱ्यासारखा फुटून आला. आपल्या समाजाच्या माथ्यावरील गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी जंग जंग पछाडलं. शिक्षकाच्या नोकरीवर लाथ मारली. गाव, जंगलं आणि पाडे पालथे घालून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं गोळा करु लागला. फक्त त्यांना गोळा न करता सावली देण्यासाठी आपल्या मंगरूळ चव्हाळा गावात (ता. नांदगाव, जि. अमरावती) फुटकेतुटके का होईना छप्पर उभारलं. पदरच्या बकऱ्या विकल्या. भीक मागितली आणि या मुलांच्या पोटापाण्याची सोय केली. प्रश्नचिन्ह नावाची शाळा सुरू केली.
पूर्वी पारध्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नव्हतं. त्यासाठी त्यानं वयाच्या १५ - १६ व्या वर्षी शिंगणापुरात रस्ता रोको आंदोलन केलं. जातिबांधवांसाठी उचललेलं हे पहिलं पाऊल. परिणामी पुढच्याच सहा महिन्यांत तीन हजार फासेपारध्यांना जातीचा दाखला मिळाला. डी. एड केल्यावर २००५ मध्ये जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळाली. त्याचवर्षी त्यानं आदिवासी फासेपारधी समिती स्थापन केली. ३०-३५ कार्यकर्ते नव्या आव्हानासाठी सज्ज झाले. रोजगार, रेशनकार्ड इत्यादी हक्कांसाठी लढा सुरू झाला. दरम्यान सीमासोबत लग्न होऊन संसाराची घडी बसली होती. पैसा मिळवून फक्त आपल्या कुटुंबाचं पोट भरणं त्याला अप्पलपोटेपणाचं वाटत होतं. ३० जुलै २०१० ची ती घटना. नाल्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांचे निष्प्राण बेवारस देह नाल्यातील झुडुपात अडकलेले सापडले. आई - वडिलांचा पत्ता नव्हताच. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांच्याच जमातीतील दोन मुलांचा ट्रेनमध्ये चोऱ्या करताना अपघाती मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे तो व्यथित झाला. आपल्या समाजाचे असे कवडीमोलाचं जगणं पाहून त्यानं निश्चय केला. समाज बदलायचा असेल तर आधी मुलांना शिक्षित करावं लागेल. हे काम नोकरी सांभाळून करण्यासारखे नव्हते. मग, त्याने विचारपूर्वक राजीनामा दिला.
दरमहा सुरळीतपणे घरात येणारा पैसा बंद होणं घरात कोणाला पचनी पडण्यासारखं नव्हते. तोपर्यंत दोन मुलींचा जन्म होऊन कुटुंबातील सदस्यांची संख्या (आई-वडिलांसह) सहा झाली होती. १५ दिवस पती/पत्नीमध्ये अबोला. अखेर, स्वत:ची तळमळ तिच्यापर्यंत पोहचवण्यात त्याला यश आले. तिचे शिक्षण कमी असलं तरी आपला नवरा वेगळा आहे. तो समाजासाठी काही तरी चांगलं करायला धडपडतोय हे जाणून घेत तिनं घराची जबाबदारी स्वीकारली. मतीन आता नि:शंकपणे बाहेर पडू लागला. गावातील ११ कार्यकर्त्यांसह त्याचा मुलांचा शोध सुरू झाला. मुंबई, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली मिळेल ते शहर - गाव गाठून १६९ मुलं गोळा केली. घरात दाणा नाही आणि खिशात आणा नाही अशी स्थिती. ३७४ चौरस फुटाचं एक गोडाऊन हितचिंतकाच्या कृपेनं मिळालं. पत्र्याची शेड असलेल्या त्या घराला हवा येण्यासाठीही फट नाही. बाहेरच्या बाजूला तट्टे ठोकून उभं केलेलं दोन बाथरूम आणि नैसर्गिक विधींसाठी मोकळं रान, असा मतीनचा नवा संसार सुरू झाला.
मतीनच्या त्या १६९ मुलांचा आणि संस्कार या शब्दाचा कधी संबधच आला नाही. रोज आंघोळ करायची असते, कपडे बदलायचे असतात हे त्यांना माहितीच नव्हतं. मुलांना नदीवर घेऊन जायचं. अंघोळ घालायची. त्यांचे अंग घासायचं. त्यातील बरीच मुलं निराधार होती. कोणाचे आई-वडील जन्मठेपेची शिक्षा भोगताहेत, काही सर्पदंशाने, अस्वलाच्या हल्ल्यात, शिकारीला गेल्यानंतर शेतकऱ्याने टाकलेल्या विजेतारेला स्पर्श होऊन धक्क्याने मेले अशी. कोणी मुले भंगार गोळा करीत तर कोणी भीक मागे. त्यांच्या कमाईवर कुटुंबांचं पोट भरे. मिळालेल्या भीकेतली निम्मी रक्कम दलालाला द्यावी लागे. तशा स्थितीत जगणाऱ्या मुलांना शाळेत आणणे सोपे नव्हते. मुलांचे पालक आणि दलाल दोघेही शाळेचे शत्रू. त्यामुळे पहिली लढाई लढावी लागली ती त्या मुलांच्या आई-वडिलांबरोबर. त्याहून सगळ्यात मोठा प्रश्न होता तो त्या मुलांच्या दोन वेळच्या भुकेचा. कधी पाण्यात कालवलेलं पीठ पिऊन (आमिळ) तर कधी उपाशीपोटी दिवस ढकलले जात होते. आपला लढा शासनापर्यंत पोहचावा, त्यांनी दखल घ्यावी म्हणून मतीननं ‘भीक मांगो आंदोलन' सुरू केलं. दर शनिवार-रविवारी मुलं, कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात पदयात्रा काढत. दिवसाला ७०-८० किलोमीटर चालत धान्य, कपडे, भांडी, चपला, पेन, पेन्सिली ज्या वस्तू मिळत त्या गोळा करुन गावात येत. आपल्या दोन लहान मुलींना सासूू, सासऱ्यांजवळ ठेवून सीमाही भीक यात्रेत सामील व्हायची. इथल्या मुलींची वेणीफणी, लहान मुलामुलींच्या अंघोळी, नखे कापणं, सर्वाचा दोन वेळचा स्वयंपाक ही जबाबदारी तिनं स्वतःच्या अंगावर घेतली.
मतीननं मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रपतीपर्यंत अनेक नेत्यांना भेटण्यासाठी नागपूर, मुंबई ते दिल्लीपर्यंत असंख्य चकरा मारल्या. राज्यकर्ते जुमानत नव्हते. पारध्यांनी भीक मागावी ती शिळ्या अन्नाची, भाकर-तुकड़याची, शिक्षणाची नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यानं अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलीस आयुक्तापर्यंत ‘भीक मांगो' आंदोलन केलं. भीक मागणं हा गुन्हा म्हणून पोलिसांनी मोर्चातील सर्वाना तुरुंगात डांबलं. ही बातमी पोलिसांमार्फत घरी कळली तेव्हा सीमामधली रणरागिणी जागी झाली. तिनेही ७०-८० स्त्रियांना गोळा केलं. दोन बकऱ्या विकल्या. दोन टेम्पो भाड़याने मिळवले आणि हा मोर्चा थेट जेलवर जाऊन धडकला. आमच्या माणसांना सोडा नाही तर आम्हाला आत घ्या, ही त्यांची मागणी. पोलिसांनी त्यांनाही तुरुंगाची हवा दाखवली. सीमा सहा महिन्यांची गरोदर. (जन्माआधीच संघर्ष करावा लागला म्हणून मुलाचं नावंही तेच संघर्ष.) ७२ तासांच्या उपोषणानंतर तीन दिवसांनी सर्वाची सुटका झाली. भीक मांगो आंदोलनातून पन्नास हजार रुपये जमले. त्यातून शाळा सुरू करायचं ठरलं. जिथे जेवायचं, झोपायचं तिथेच २२ सप्टेंबर २०१२ ला शाळा सुरू झाली. अनेक प्रश्नांसह सुरू झालेली शाळा म्हणून शाळेला नाव दिलं प्रश्नचिन्ह.
नागपूर - औरंगाबाद आणि अमरावती - यवतमाळ हे हमरस्ते परस्परांना शिंगणापूर येथे छेदतात तो शिंगणापूर चौफुला. त्या चौफुल्यापासून पश्चिमेस साधारण पाच किलोमीटरवर मंगरूळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह शाळा आहे. अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाचे बेचाळीस बेडे आहेत. मोठ्या बेड्यात नऊशेपर्यंत लोकसंख्या असते. मंगरूळ चव्हाळातील बेड्याची लोकसंख्या सातशे पन्नास आहे. प्रश्नचिन्हमध्ये पहिली ते दहापर्यंत शिकणाऱ्या ४४७ मुलांपैकी १०८ मुलांचे पालक राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात चोरीच्या गुन्ह़याखाली शिक्षा भोगत आहेत. सीमा आणि मतीन हेच आता त्यांचे पालक. कधी काळी कचरा, भंगार गोळा करणारी, भीक मागणारी, चोऱ्या करणारी ही मुलं आज येथे शिकत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मानधन न घेणारे तीन शिक्षक येथे आहेत. आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पारधी समाजाची बोली जाणणारे शिक्षक असल्यामुळे मुले शिकतात, गातात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. प्रत्येक मूल शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी मतीन धडपडत आहे. सात मुले हेमलकसा, चंद्रपूर, जळगाव, नागपूर येथे पुढील शिक्षण घेत आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचयं, कोणाला स्पर्धापरिक्षा देऊन अधिकारी व्हायचंय, मुले क्रीडास्पर्धेत चमकत आहेत. प्रश्नचिन्हच्या साडेचारशेंच्या परिवाराला आठवड़याला दोन क्विंटल धान्य लागते. तेल, मीठ, मिरची वेगळं. प्रश्नचिन्हचा पत्र्याच्या शेडमधला संसार आता पक्क्या घरात जाणार असे सांगत मतीननं उभी राहत असलेली वास्तु अभिमानानं दाखवली. प्रश्नचिन्हबद्दल जाणून घेत आम्ही पुन्हा परतीचा मार्ग धरला ते मनात एक कायमचं प्रश्नचिन्ह घेऊन. अशीही माणसं असतात ध्येयवेडी? खपाटीला गेलेल्या पोटांची ही लढाई आकंठ पोट भरलेल्या सुखवस्तू समाजाच्या हृदयापर्यंत पोहचेल?
सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं
सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर, वारासुद्धा द्यावा लागतो
सोपं नसतं मागेल त्याला, मागेल ते देत जाणं
सोपं नसतं झाड होणं..
संपर्क :
*मतीन भोसले*
भ्रमणध्वनी : ९०९६३६४५२९
Comments
Post a Comment